
मुंबई, 04 जून (हिं.स.)। विधान परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा गटाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिले नसतील तर ती कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्यावेळी तुम्ही घरात बसला होतात. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावर लढता येते आणि जिंकता येते. भाजपा-महायुतीने कार्यकर्त्यांना मोठे केले, त्यांना संधी दिली. त्यामुळे ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संकटमोचक काय करणार आहेत, हे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना समजेल. संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते, ना संकटमोचकाची. उबाठा गट पूर्ण अस्तित्वहीन झालेला असल्याने त्यांना ना संकटाची भीती आहे, ना संकटमोचकाची. तुमची मशाल कुठेकुठे विझली आहे ते पहा. आपल्या उबाठाची कचराकुंडी झालेली आहे, त्याकडे राऊतांनी पहावे. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सर्वात जास्त उद्योगपतींना तिकीट देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केले. विधान परिषदेची आणि राज्यसभेची यादी वाचून दाखवली तर तुम्ही कुठल्याकुठल्या उद्योगपतींना कसे कसे तिकीट दिले होते, हे महाराष्ट्राने पाहिले असल्याचे बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले, 2029 ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि ते पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. पुढच्या दीड वर्षांत संजय राऊत हे उबाठा गट सोडून राज्यसभेसाठी राहुल गांधींच्या पाया पडून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे संजय राऊतांना राज्यसभेची संधी देणार नसल्याने संजय राऊत यांच्यासमोर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
बारामतीत सुरु असलेले युगेंद्र पवार यांचे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही तर हा युगेंद्र पवार विरुद्ध रोहित पवार असा हा सामना आहे. दोन-चार दिवसांपासून रोहित पवार महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. मग रोहित पवारांचा गट पुढे चालला आहे म्हणून आज युगेंद्र पवार आपली वेगळी चूल मांडत आंदोलनाचा प्रयत्न करत आहेत. हा लढा महागाईच्या विरोधात नाही, तर शरद पवार यांचे वारसदार रोहित पवार आहेत की युगेंद्र पवार यासाठी सुरू आहे, असे बन म्हणाले.
ममता बॅनर्जींचा पक्ष भाजपाने फोडला नाही तर ममता बॅनर्जीं, अभिजीत बॅनर्जींची दादागिरी झुगारून तिथल्या आमदारांनी स्वतःला स्वतंत्र करून घेतले असल्याचे सांगून बन म्हणाले, आता पश्चिम बंगाल दहशतमुक्त राज्य झाले आहे. या आमदारांनी त्यांचा स्वतंत्र गट केलेला आहे. आता ना ममतादीदींची दहशत राहिली, ना त्यांच्या भाच्याची. ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला, त्यांच्या अहंकाराचा गड हा पश्चिम बंगालच्या जनतेने उध्वस्त केला आहे. त्यामुळे आजपर्यंत दहशतीत राहणाऱ्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आणि ते स्वतंत्रपणे आपले धोरण आणि विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर