
राज्यातील 60 लाभार्थ्यांना वैयक्तिकृत गतिशीलता उपकरणांचा लाभ
नागपूर , 27 जुलै (हिं.स.) : दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने मोबिस इंडिया फाउंडेशनने नागपुरात 20 व्हीलचेअर वापरकर्त्यांना अत्याधुनिक वैयक्तिकृत गतिशीलता उपकरणांचे वितरण केले. हुंदाई मोबिसच्या भारतातील सीएसआर शाखेच्या ऍक्सेसिबिलिटी अँड फ्रीडम या प्रमुख उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात नागपुरातून झाली असून राज्यातील एकूण 60 व्हीलचेअर वापरकर्त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पुढील टप्प्यात रत्नागिरीतील 29 आणि रायगडमधील 11 लाभार्थ्यांना वैयक्तिकृत गतिशीलता उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे. रायगडमधील वितरण कार्यक्रम मोबिस इंडिया लिमिटेडच्या वेअरहाऊसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी आयआयटी मद्रासमध्ये विकसित झालेल्या नियोमोशन या सहाय्यक तंत्रज्ञान कंपनीने मोबिस इंडिया फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या शारीरिक गरजा आणि मोजमाप लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या नियोफ्लाय व्हीलचेअर आणि नियोबोल्ट मोटार-चालित जोडणी देण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे व्हीलचेअर काही सेकंदांत वैयक्तिक मोटार-चालित वाहनात रूपांतरित होत असून वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि स्वतंत्रपणे प्रवास करता येणार आहे.
महाराष्ट्रातील हा उपक्रम मोबिस इंडिया फाउंडेशनच्या ₹6.3 कोटींच्या राष्ट्रीय गतिशीलता सक्षमीकरण अभियानाचा भाग आहे. देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 600 व्हीलचेअर वापरकर्त्यांना आधुनिक गतिशीलता उपकरणे उपलब्ध करून देण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा, क्रीडा आणि सामाजिक सहभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी मोबिस इंडिया फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख नरसिम्हन जी. म्हणाले, सुलभता ही संधी निर्माण करणारी शक्ती आहे. गतिशीलतेचे स्वातंत्र्य मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जीवनात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतात. आम्ही केवळ उपकरणांचे वितरण करत नसून त्यांच्या आकांक्षा आणि क्षमतांमध्ये गुंतवणूक करत आहोत.
जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी (आयएएस) यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, सरकार, उद्योग आणि सामाजिक संस्थांमधील अशा भागीदाऱ्यांमुळे अधिक समावेशक आणि न्याय्य समाज घडण्यास हातभार लागतो. प्रत्येक लाभार्थ्याच्या गरजेनुसार उपकरणे उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
नागपुरातील वितरणानंतर हा उपक्रम रत्नागिरी आणि रायगडमध्येही राबविण्यात येणार असून राज्यातील 60 लाभार्थ्यांपर्यंत त्याचा विस्तार होणार आहे. देशभरातील विविध राज्यांमध्येही हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवून दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभता, स्वातंत्र्य आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचा मोबिस इंडिया फाउंडेशनचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी