

रायगड, 27 जुलै (हिं.स.)। देशाच्या लोकशाही इतिहासातील आणीबाणीच्या काळाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा अलिबाग येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास आमदार संजय केळकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, सभापती वैकुंठ पाटील, डॉ. चित्रा पाटील, अॅड. महेश मोहिते, अॅड. अंकित बंगेरा आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर व आमदार विक्रांत पाटील यांनी १९७५ मधील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत लोकशाही संस्थांवरील परिणाम, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरील निर्बंध आणि प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिप यांचा उल्लेख केला.
संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. 'आणीबाणी योग्य की अयोग्य', 'आणीबाणी : वस्तुस्थिती आणि विपर्यास' तसेच 'आणीबाणीचे भारतावर झालेले दुष्परिणाम' या विषयांवर झालेल्या स्पर्धांमध्ये निबंध विभागात अॅड. रत्नाकर सखाराम पाटील, तर वक्तृत्व स्पर्धेत प्रा. सानिका शरद घरत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)