
रत्नागिरी, 27 जुलै (हिं.स.) । भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करून पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग २५ बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. २५ कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पद्धतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीची आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नावीन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांनी मागील वेळच्या सिंधुरत्न योजनेमधून झालेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या यंत्रणेकडे किती निधी आहे, कोणती कामे पूर्ण झाली, अपूर्ण कामांची कारणे व सद्यःस्थिती याबाबतची माहिती यात होती. ते पुढे म्हणाले, या आढाव्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन देणारा बांबू शेतकऱ्यांना देण्यात यावा. त्यासाठी संशोधन व सुविधा केंद्र व्हायला हवे. काजू बोंडापासून पक्रिया उद्योगातून ज्यूस, सिरप विविध उत्पादने तयार करण्याचे प्रकल्प होऊ शकतात. सीएमईजीपीच्या माध्यमातून 35 टक्के सब्सिडी दिली जाते. 25 बचतगटांचा क्लस्टर करून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सिंधुरत्न योजना आणि सीएमईजीपीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर सादरीकरण करा. वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त पोहोचल्या पाहिजेत तसे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करावेत.
भाट्ये येथे टर्मिनल तयार करून हाऊस बोट प्रकल्प चालविला जाईल. त्यामधून मिळणारा नफा हा प्रभाग संघाना दिला जाईल. मत्स्यालय हे पर्यटन स्थळ झाले पाहिजे, अशा पद्धतीने अतिशय चांगला प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी 25 कोटी रुपये दिले जातील.
नावीन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव तयार करताना अधिकाऱ्यांनी आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षण यावर अधिक भर द्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले. बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी