
नाशिक, 28 जुलै (हिं.स.) नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेले नियोजन पाहता नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपाल श्री. वर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे,उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे आगामी कुंभ सुंदर, स्मरणीय आणि भव्य होऊन जगात नाशिक त्र्यंबकेश्वरची ओळख प्रस्थापित होईल. उद्योग, पर्यटन, संस्कृती आदी विविध स्तरावर नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल. सोहळ्याची भव्यता लक्षात घेता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक चांगले नियोजन करणे शक्य होणार आहे.
बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यास समाज माध्यमांद्वारे माहिती मिळणे सुलभ झाल्याने अधिक भाविक येतील. त्यातच यादरम्यान पावसाळा असल्याने नियोजनाचे मोठे आव्हान असेल. विशेषतः स्वच्छता आणि आरोग्याच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे लागेल. देशभरातील धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणारा कुंभमेळा भव्य- दिव्य ठरेल. आतापर्यंत व्यापक नियोजन केले असले, तरी प्राधिकरणाने प्रयागराज येथील अनुभव लक्षात घेता अधिक तयारी करावी. त्र्यंबकेश्वर येथील नियोजित विकास कामांच्या नियोजनाबाबत राज्यपाल श्री. वर्मा समाधान व्यक्त केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त राहील. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. पायाभूत सोयीसुविधांची कामे वेळेत पूर्ण करताना त्यांचा दर्जा राखला पाहिजे. याबरोबरच कामांना गती द्यावी लागेल. त्र्यंबकेश्वरचे महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन कामे करावीत. आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करावा असेही त्यांनी सांगितले.
प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम, आयुक्त श्री. सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, मलनि:स्सारण प्रकल्पासह विविध कामांची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV