
- पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट (हिं.स.)२०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधूला चीनच्या वांग झी यीकडून पराभव पत्करावा लागला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टी इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून पराभूत झाला.
आयुष शेट्टीने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी यू चीला पराभूत करून खळबळ उडवून दिली होती, परंतु उपांत्यपूर्व फेरीत १२ व्या क्रमांकाच्या खेळाडूकडून तो १९-२१, ११-२१ ने पराभूत झाला. फरहानसोबतची आयुषची ही आठवी लढत होती आणि त्यात त्याचा पाचवा पराभव झाला. या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. लक्ष्य सेन एक दिवसापूर्वी ९२ व्या क्रमांकाच्या अमेरिकन खेळाडू गॅरेथ टेनकडून पराभूत झाला होता.
तिसऱ्या मानांकित वांगने पाच वेळच्या पदक विजेत्या सिंधूला २१-११, १५-२१, २१-१७ असे हरवले. आठ सामन्यांनंतर, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चिनी खेळाडूकडून झालेला भारतीय स्टारचा हा पहिलाच पराभव होता. गेल्या वर्षी याच स्पर्धेत सिंधूने वांगला हरवले होते, पण यावेळी ती अपयशी ठरली. आता उपांत्यपूर्व फेरीत वांगचा सामना डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसेनशी होईल, जिने सहाव्या मानांकित पुत्री कुसुमा वरदानीला हरवले आहे.
गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून एक मोठा उलटफेर घडवला आहे. आता त्या पदकापासून केवळ एक विजय दूर आहेत. गुरुवार, २० ऑगस्ट रोजी, या भारतीय जोडीने जपानच्या सातव्या मानांकित रिन इवानागा आणि केई नाकानिशी यांना हरवून स्पर्धेत एक मोठा उलटफेर घडवला. जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या त्रिशा आणि गायत्री संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इंदिरा गांधी स्टेडियमवर हा आत्मविश्वास पुन्हा एकदा दिसून आला, जेव्हा त्यांनी सातव्या मानांकित जोडीला २१-१६, २१-१२ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे