
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट (हिं.स.) ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालने निवडणूक राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, तिने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या नेहवालने सांगितले की, तिला आपल्या क्रीडा कारकिर्दीनंतरही देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे आणि राष्ट्राची सेवा करत राहायचे आहे. २०२० मध्ये, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत नेहवाल भाजपमध्ये सामील झाली होती. नेहवालला याबद्दल विचारले असता तिने सांगितले, मला यायचे आहे. मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण मी निश्चितपणे त्याबद्दल विचार करत आहे.
ती पुढे म्हणाली, ज्याप्रमाणे मी अनेक वर्षे देशासाठी खेळले, आणि आता मी भाजपमध्ये आहे, तेव्हा ते ज्या प्रकारे देशासाठी, विकासासाठी काम करत आहेत, ते मला आवडते. त्यामुळे, मी त्यांच्याशी जोडलेली आहे. मलाही देशासाठी अधिक चांगले काम करायला आवडेल. मी नेहमीच देशाच्या भल्याचा विचार केला आहे. आणि मी अनेक पदके जिंकली आहेत. त्यामुळे, आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करावे, अशी माझी इच्छा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या BWF जागतिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महिला दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि शांत कामगिरीचेही नेहवाल यांनी कौतुक केले. नेहवाल म्हणाली की, भारताने एकेरी स्पर्धांमध्ये अधिक पदके जिंकावीत अशी त्यांना आशा होती. त्यांनी या जोडीच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि दबावाखाली असताना त्यांच्या आत्मविश्वासाची व संयमाची प्रशंसा केली.
सायना नेहवाल म्हणाली की, यावेळी भारताला आणखी पदके मिळतील अशी मला आशा होती, पण मला त्रिशा आणि गायत्री यांचा खूप अभिमान वाटतो. त्या मोठ्या आत्मविश्वासाने खेळल्या आणि दबावाखालीही त्यांनी उत्तम संयम दाखवला. जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या त्रिशा आणि गायत्री यांनी तीन मानांकित जोड्यांना पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. यामुळे महिला दुहेरीतील पदकासाठी भारताची १५ वर्षांची प्रतीक्षा संपली; यापूर्वी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी ही कामगिरी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे