
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हिं.स.) नेपाळमधील विनाशकारी पुराचा फटका अनेक भारतीयांनाही बसला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पाच मोठे गट बेपत्ता झाले आहेत. या गटांमध्ये एकूण २८८ भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये त्रिशुली १ वीज प्रकल्पात काम करणारे भारतीय आणि देशभरातील विविध राज्यांमधून गटागटाने आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे. शिवाय, आज दुपारी १ वाजेपर्यंत २१ भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्रिशुली १ वीज प्रकल्पात काम करणाऱ्या ७३ भारतीयांसह, भारतीयांचे पाच मोठे गट सध्या संपर्कात नाहीत. प्रवक्त्याने सांगितले की, या व्यक्तींबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी काठमांडूमधील भारतीय दूतावास प्रकल्प प्रमुखांच्या संपर्कात आहे. परिसरातील दळणवळण यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, त्यामुळे स्थानिक लोकांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे.
याव्यतिरिक्त, सम्राट आणि फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्स (दोन वेगवेगळे ट्रॅव्हल एजंट) मार्फत कैलास मानसरोवरला प्रवास करणारे तमिळनाडूचे ३७ आणि ४९ नागरिकांचे दोन वेगवेगळे गट, सम्राट ट्रॅव्हल्ससोबत रसुवा जिल्ह्यातील तिमुरे (जिथे अपघात झाला) येथे प्रवास करणारे पश्चिम बंगालचे ३२ भारतीय, रिचा टूर्स मार्फत प्रवास करणारे विविध राज्यांतील ६१ भारतीय आणि केरळमधील ३३ भारतीय नागरिकांचा एक गट अद्याप संपर्कात आलेला नाही.
प्रवक्त्याने सांगितले, आम्ही नेपाळी अधिकाऱ्यांमार्फत आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्हाला या प्रकरणी पुढील माहिती मिळेल आणि आम्ही शक्य तितक्या लवकर तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू.
शिवाय, आज दुपारी १:०० वाजेपर्यंत, २१ भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. हा २१ जणांचा गट तमिळनाडूचा आहे. काठमांडूमधील आमच्या दूतावासाने आणि राजदूतांनी या गटाशी संवाद साधला असून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. ते काठमांडूला पोहोचत असून, त्यांना शक्य तितक्या लवकर मायदेशी परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.
मदतकार्याचा तपशील देताना प्रवक्ते म्हणाले, आम्ही दोन विमानांमधून ४७.५ टन मदत आणि बचाव साहित्य पाठवले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधला. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा असून, सर्वतोपरी मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे