
प्रयागराज, 31 ऑगस्ट (हिं.स.) : पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनौरी बाजारात सोमवारी दुपारी 12 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात अचानक आग लागल्यानंतर भीषण स्फोट झाला. कारखान्यातील फटाक्यांचे एकापाठोपाठ जोरदार स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून डझनभरांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयासह इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात आग लागल्यानंतर तेथे ठेवलेल्या फटाक्यांचे सलग जोरदार स्फोट होऊ लागले. या स्फोटांचा आवाज अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. काही वेळातच कारखान्यातून निघालेल्या धुराच्या दाट लोटांनी परिसर व्यापला आणि मनौरी बाजारात मोठी घबराट पसरली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की कारखान्याच्या आसपासची 15 हून अधिक घरे कोसळल्याची किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अनेक घरांच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटामुळे विटा आणि घरांचा मलबा सुमारे २५० मीटर अंतरावरील रेल्वे पुलापर्यंत जाऊन पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने मलबा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या एका घरात फटाक्यांचा कारखाना सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्यावेळी कारखान्यात सुमारे डझनभर लोक उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर सतत होत असलेल्या स्फोटांमुळे सुरुवातीला स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांना कारखान्यात प्रवेश करणे कठीण झाले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून अचानक धूर निघू लागल्यानंतर फटाक्यांचे स्फोट सुरू झाले. कारखान्याच्या वरून वीजवाहिन्याही गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच कौशांबी आणि प्रयागराज जिल्ह्यातील पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एडीजी, आयजी, डीआयजी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कौशांबीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. तब्बल दोन पोलीस ठाण्यांच्या पथकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.
एअरफोर्सचे जवानही बचावकार्यात सहभागी
दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनासोबतच लष्कर तसेच एअरफोर्सच्या जवानांनाही बचावकार्यात सहभागी करण्यात आले आहे. जवान मलब्यात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.स्फोटात अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले. काही जखमींना स्थानिक नागरिकांनी छोट्या मालवाहू वाहनांमधून तसेच खाटांच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
फटाक्यांच्या कारखान्यात आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यानंतर एवढा मोठा स्फोट कसा झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती गोळा केली जात आहे.सध्या मलब्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देणे याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. मृतांचा नेमका आकडा आणि जखमींची स्थिती याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी