
अमरावती, 31 ऑगस्ट (हिं.स.)। लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस उरले असून, घराघरांत आणि गल्लीबोळांत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरणार आहे. मूर्तिकारांनी गेल्या आठ महिन्यांपासून अथक परिश्रम घेत तब्बल ९० हजार ते १ लाख मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींच्या वाढत्या मागणीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला निसर्गरक्षणाची नवी किनार मिळणार आहे.
मूर्तीनिर्मितीसाठी नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथून माती आणली जाते. माती आल्यानंतर तिच्यावर प्राथमिक प्रक्रिया करून त्यातील अशुद्ध घटक वेगळे केले जातात. सध्या पगमिल मशीनच्या तांत्रिक मदतीमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. माती तयार झाल्यानंतर मूर्तीच्या आकारानुसार साचे तयार केले जातात. या साच्यांवर मातीचे थर देत मूर्तीला आकार दिला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंतच्या तब्बल २५ ते ३० प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत. गणेशमूर्तींच्या निर्मितीचे बहुतांश काम आता पूर्ण झाले असून, सध्या मूर्तिकारांकडून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तींना आकर्षक रंग देण्यासोबतच डोळे, मुकुट, वस्त्र, दागिने आणि इतर बारकावे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. काही मूर्तींवर अंतिम रंगाचा हात दिला जात आहे, तर काहींचे अलंकरण अंतिम टप्प्यात आहे. येत्या ११ सप्टेंबरपासून मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जाणार असल्याने मूर्तिकारांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही धावपळ वाढली आहे.
सुमारे २०० रुपयांपासून मूर्ती उपलब्ध होणार यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्तीनिर्मितीसाठी लागणाऱ्या अन्य साहित्याच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम मूर्तींच्या अंतिम किमतीवर झाला आहे. येत्या ११ सप्टेंबरपासून गणेशमूर्तींचे विक्री स्टॉल सुरू होणार असून, सुमारे २०० रुपयांपासून मूर्ती उपलब्ध होणार आहेत.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी