
नवी दिल्ली , 15 सप्टेंबर (हिं.स.)। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहे उभारण्याची घोषणा केली आहे. सरकारने तब्बल १० हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांसोबतच मुलींसाठीही स्वतंत्र व्यवस्था असेल. दिल्लीतील कोणत्याही विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, परवडणारे आणि सोयीस्कर निवास उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, संबंधित विभागांसोबत बैठका घेण्यात आल्या असून, वसतिगृहे उभारण्यासाठी योग्य ठिकाणांची निवडही करण्यात आली आहे. या योजनेच्या धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधांचाही यात विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची चिंता राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, ही वसतिगृहे अत्यंत सुरक्षित असतील, त्यामुळे देशभरातील पालक आपल्या मुलांना निश्चिंतपणे दिल्लीला शिक्षणासाठी पाठवू शकतील. विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाची चिंता न राहता त्यांना पूर्णपणे आपल्या शिक्षणावर आणि भविष्यातील स्वप्नांवर लक्ष केंद्रित करता यावे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode