
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.) - राजस्थानमधील तरुणांचा राजकीय वापर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला असून, ‘वंदे मातरम्’ पूर्ण म्हणणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे, असे मत राजस्थान महापालिका प्रभारी व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने मुसंडी घेतली. त्या पार्श्वभूमीवर ते मत मांडत होते.
बावनकुळे म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकसित भारताच्या संकल्पावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. राजस्थानमधील तरुणांनी चुकीच्या राजकारणाला नकार देत मोदी आणि विकसित भारताच्या बाजूने कौल दिला.”
राजस्थानमध्ये ३१८ नगरपालिका, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी जवळपास २३९ नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचे बोर्ड स्थापन होणार आहेत. दहा महानगरपालिकांचा विचार केला तर आठ महानगरपालिकांमध्ये भाजपचे महापौर होणार आहेत. केवळ बिकानेर आणि अजमेर या दोन ठिकाणी भाजप थोड्या बहुमताने मागे राहिला आहे. त्यामुळे हा राजस्थानच्या जनतेचा मोठा विजय असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि राजस्थानमधील सर्व आमदार, खासदार तसेच पक्षाच्या नेत्यांच्या मेहनतीचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प राजस्थानच्या जनतेने मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीचे नियोजन केले. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी संघटनेची मजबूत रचना उभी केली. पक्षाच्या प्रभारी म्हणून योग्य दिशा देण्यात आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला, असे बावनकुळे यांनी सांगितले.
भाजप ३९ नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिका मिळून २३९ ठिकाणी बोर्ड स्थापन करीत आहे. दहा कॉर्पोरेशनपैकी आठ ठिकाणी भाजपचे बोर्ड बनत आहेत. बिकानेर आणि अजमेर या दोन ठिकाणी पक्ष थोडा मागे आहे; मात्र आठ ठिकाणी बोर्ड बनत असल्याने हा राजस्थानच्या जनतेचा मोठा विजय आहे. काँग्रेसने जेनजीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या चुकीच्या नीतीला जनतेने नाकारले आणि काँग्रेसला मोठी फटकार दिली, असे बावनकुळे यांनी पुन्हा स्पष्ट केले.
प्रीमियर कंपनीच्या जमिनीप्रकरणी एसआयटीचा अहवाल येणार
कल्याणमधील आयकॉनिक पद्मिनी प्रकरणातील जमीनवाटपाबाबत चौकशी सुरू असून, आमदार नानाभाऊ पटोले यांनी चौकशीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर चौकशी स्थापन करण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाची एसआयटी स्थापन करण्याची घोषणा आपण विधानसभेतच केली होती. प्रीमियर कंपनीच्या जमिनीशी संबंधित प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आमच्यासमोर येईल. अहवाल आल्यानंतर नानाभाऊ पटोले यांनी विधानमंडळात जे मुद्दे मांडले होते, त्याचे स्पष्टीकरण विधानमंडळातच करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी