
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। वैजापूर तालुक्यात सध्या चोरी, दरोडे आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः खंडाळा परिसरात दिवसा घरात दरोडा पडल्याची घटना, तसेच खंडाळा–जानेफळ रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन अडवून मारहाण व लूटमार झाल्याच्या घटना नागरिकांसाठी अत्यंत चिंताजनक आहेत.
अंचलगाव येथे देखील घरांवर दरोडा पडल्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच महामार्गावर वाहन अडवून मारहाण करून लूटमार होत असल्याच्या घटनांमुळे प्रवाशांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
नागरिकांचे काही गंभीर प्रश्न आहेत
चोर आणि दरोडेखोरांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का?
या घटनांमुळे नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही नागरिक पोलीस कारवाईच्या प्रभावीतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस विभागाने या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांचा विश्वास कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
वैजापूर तालुक्यात तातडीने रात्रीचे पोलीस पेट्रोलिंग वाढवावे.
संवेदनशील गावांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा. महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर नियमित गस्त वाढवावी.
चोरी व दरोड्यांतील आरोपींना तातडीने पकडून कठोर कारवाई करावी.
नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष व्यवस्था करावी.
गावागावात पोलीस आणि नागरिकांच्या संयुक्त बैठका आयोजित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis