
- कोकणसह विदर्भात मुसळधार सरींचा अंदाज
नवी दिल्ली, 07 सप्टेंबर (हिं.स.) : दक्षिण-पश्चिम मॉन्सून सक्रिय असल्याने महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांना भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पावसाचा अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या डोंगराळ भागांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि मातीची धूप होण्याचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता असून, विदर्भात 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सूनशी संबंधित हवामान प्रणाली सक्रिय असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि गोव्यात 7 ते 12 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम तसेच स्थानिक पातळीवर जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
विदर्भातही मुसळधार पाऊस
विदर्भासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर-गडचिरोली परिसरात पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, सखल भागातील नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पावसाच्या लहरींमुळे शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी काही भागांत पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो.मात्र, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास शेतांमध्ये पाणी साचणे, पिकांचे नुकसान तसेच स्थानिक नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत जाणे टाळावे. डोंगराळ आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी