सोलापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व पुण्यासह अन्यत्र वास्तव्यास गेलेले नागरिक शहर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुण दिवाळीसाठी गावाकडे येत असतात. मात्र, रेल्वेची प्रतीक्षा यादी लांबलचक तर असल्यामुळे मिळेल तिथे बसून वा प्रसंगी उभे राहून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. सोलापूरकडे येणारी प्रत्येक बस व रेल्वे फुल्ल धावत आहेत.
येथील शहर व जिल्ह्यातील अनेक तरुण, तरुणी हे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अन्य शहरात वास्तव्यास आहेत. हे तरुण दिवाळीचा सण गावातील सर्व नातेवाइकांच्या समवेत साजरा करण्यासाठी गावाकडे येतात. नोकरी व व्यवसायानिमित्त दुसरीकडे असलेल्या तरुणांना दिवाळीच्या दरम्यान गावाची ओढ असते. भाऊबिजेला ओवाळूून घेण्यासाठी गावी बहिणीकडे यावे लागते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड