
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शुक्रवार दि.३१ रोजी एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
यानिमित्त दि.३१ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाठकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, डॉ, महेश लढ्ढा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.३१) पदयात्रा
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी पदयात्रा आयोजीत करण्यात आली आहे, ही पदयात्रा सकाळी ७.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासुन सुरु होईल. जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, शहागंज येथे या पदयात्रेचा समारोप होईल. या रॅलीत सर्व शासकीय कर्मचारी- अधिकारी, राजकीय- सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटना, सामाजि संघटना यांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
दि.२५ नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रम
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रम दि.३१ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजीत करण्यात आले आहेत. त्यात सव महाविद्यालये व माध्यमिक विद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वादविवाद स्पर्धा घेण्यात येतील. सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रनिर्माण याविषयावर आधारीत विविध कार्यक्रम होतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis