परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून अहवाल सादर करण्यात होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात “न्यायमूर्ती बदर समिती अहवाल द्या – वर्गीकरण अंमलात आणा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजीच राज्य सरकारला आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले, त्यानुसार न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. मात्र, जवळपास एक वर्ष उलटून गेल्यानंतरही समितीकडून अहवाल सादर झालेला नाही, ही खेदजनक बाब असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis