परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। गत महिन्यात मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या महापुराच्या पाण्याने नदीकाठावरील शेती पिके उद्ध्वस्त केली, तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आणि पशुधन वाहून गेले.
याच पार्श्वभूमीवर डाकूपिंप्री येथील नुकसानग्रस्त शेतकरी नवनाथ वैजनाथ सोनवने यांनी पाथरी तहसीलदारांना निवेदन देत दोन दिवसांत पंचनामा करून नुकसानभरपाई न दिल्यास ९ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
सोनवने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मौजे डाकूपिंप्री शिवारातील गट क्रमांक १ मधील माझ्या १ हेक्टर ६० आर क्षेत्रातील शेतीत २८ सप्टेंबर रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे बॅकवॉटर आले. हे पाणी सलग दोन दिवस राहिल्याने कापूस व सोयाबीन पिके पूर्णपणे नष्ट झाली. तसेच शेतीजमीन घासून गेली असून ३० कोंबड्या, २ शेळ्या, तसेच शेतीतील औजारे, साहित्य व सोलार पॅनलचे पूर्ण नुकसान झाले आहे.”
सोनवने यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा “न्याय न मिळाल्यास आत्मदहन करून शासनाचे लक्ष वेधण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, स्थानिक शेतकरी संघटनांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली असून, तहसील प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महापुरानंतर शेतकऱ्यांच्या शेती, पिके आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis