सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ शहरासह पाच ते सहा गावांतील नागरिकांना रहदारीसाठी उपयोगी असणाऱ्या कोळेगांव-आष्टे बंधाऱ्याला जोडणारा रस्ता व बंधाऱ्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले लोखंडी खांब पुर्णतः वाहुन गेल्यामुळे बंधाऱ्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर कोळेगाव- आष्टे बंधाऱ्याजवळ असून, सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेती आजही पुराच्या चिखलात असल्याचे दिसून येत आहे. तरी पुरामध्ये वाहून आलेली लहान- मोठी झाडे, इतर वस्तू बंधाऱ्याच्या तोंडाला अडकलेली आहेत.
या बंधाऱ्यावरून मोहोळ, रेल्वे स्टेशन वसाहत, कोळेगाव, भांबेवाडी, आष्टे, हिंगणी (नि), शिरापूर आदी गावांना ये-जा करण्यासाठी असणारा डांबरी रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नदीकाठावरील विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. पंधरा दिवसांपासून विजेचा पुरवठा बंद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड