
जळगाव, 15 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून यासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून ज्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. नगरपरिषदा-नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे.उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती.
या मागणीनंतर त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर