

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2025 मध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.
कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनमध्ये ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील भारताची प्रगती, वैविध्यपूर्ण प्रकल्प आणि शाश्वत पद्धतींबद्दलचे सादरीकरण, अभ्यागतांचे आकर्षण ठरत आहेत. या पॅव्हिलियनमध्ये खुल्या खाणकाम (ओपनकास्ट माइनिंग) पद्धतीचे प्रदर्शन, कोळसा खाणीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, तसेच कोल इंडिया लिमिटेडच्या सहाय्यक कंपन्यांच्या मुख्यालयातील एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्र यांच्या कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कार्यात्मक परिणामकारकता आणि सुरक्षा विषयक अनुपालन यात वाढ झाली आहे. याशिवाय सुरक्षितता आणि परिचालन प्रशिक्षणासाठी वर्धित वास्तव या उदयोन्मुख तत्रंज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण पॅव्हेलियनमध्ये आयोजित केले आहे.
पॅव्हिलियनमध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोळसा मंत्रालयाच्या कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) उपक्रमाबद्दल दिलेली माहिती, त्यामाध्यमातून स्वच्छ कोळशाकडे भारताच्या संक्रमणाचा एक प्रमुख सक्षम घटक मांडण्यात आला आहे, तसेच कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांचाही यात समावेश आहे. याशिवाय या मंडपात पर्यावरणीय पुनर्संचयनाच्या तत्त्वांना पाठिंबा देणारे इको-टुरिझम उपक्रम देखील प्रदर्शित केले आहेत.
याशिवाय लिथिअम आणि कोबाल्ट या महत्त्वाच्या खनिजांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिग्रहित करण्याच्या कोल इंडिया लिमिटेडच्या धोरणात्मक उपक्रमांना देखील अधोरेखित करण्यात आले आहे. भारताचे या महत्त्वपूर्ण स्रोतांसाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करुन या खनिजांवर अवलंबून असलेल्या विविध उद्योगांच्या वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा दृष्टिकोन यातून दिसून येतो.
कोल इंडिया लिमिटेडसाठी, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा हे हितधारक, उद्योग भागीदार आणि जनसामान्यांशी संवाद साधण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरते. तसेच ते राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या भूमिकेबद्दल पारदर्शकता आणि जनजागृती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule