लातूर मनपा नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज , चारशेहून अधिक अर्ज दाखल
३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला आहे. तब्बल ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी
लातूर मनपा नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज , चारशेहून अधिक अर्ज दाखल


३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

आगामी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला आहे. तब्बल ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागणी करीता पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत.

कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून, पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुदतवाढीला हिरवा कंदील दिला असून, आता इच्छुकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करता येणार आहेत.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागवण्याची मोहीम सुरू केली होती. शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार ४०० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. ॲड. किरण जाधव यांनी सांगितले की, हा प्रतिसाद पक्षासाठी अत्यंत उत्साहवर्धक असून, केवळ सक्रिय कार्यकर्तेच नव्हे, तर विविध समाज घटकांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि प्रमुख व्यक्तींनीही उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीसाठी असलेली ही उत्सुकता लातूरमध्ये काँग्रेसच्या वाढत्या ताकदीचे आणि जनमानसातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

नोव्हेंबर महिन्यात असलेल्या विवाह समारंभांमुळे (लग्नाच्या तारखा) तसेच अन्य व्यस्ततेमुळे अनेक इच्छुक वेळेत अर्ज सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने कार्यकर्त्यांच्या या मागणीसंदर्भात राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा केली. आमदार अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढीला त्वरित मंजुरी दिली आहे.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मंजुरीनंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली: ४०० अर्ज दाखल होऊनही आणखी अनेक जण इच्छुक असल्याने, तसेच अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक होती.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande