
सहायकांनी ई-पीक पाहणी पुर्ण करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यभरात खरीप हंगाम २०२५ ची ई-पीक नोंदणी १ ऑगस्ट पासून सुरु आहे. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी डिजीटल क्रॉप सर्वे (डिसीएस) मोबाईलअॅप उपलब्ध करुन दिले आहे. शेतकरी स्तरावरील ई- पीक नोंदणीचा कालावधी १ ऑगस्ट ते ३० सप्टेबर होता. 1 ऑक्टोबर पासून सहायक स्तरावरील पीक पाहणी चालू आहे. या नोंदणीची मुदत ३० नोव्हेबर रोजी संपत आहे. ई- पीक पाहणीसाठी केवळ ५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी ई-पीक नोंदणी पुर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयात एकूण ११२७८४७ पीक पाहणी करावयाची खातेदार संख्या असून त्यापैकी ७१८५३० इतक्या खातेदारांची शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी पुर्ण झाली आहे. १ ऑक्टोबर पासून सहायक स्तरावर ई-पीक पाहणी नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. असे असले तरी अद्याप ४०१९६३ शेती खातेदारांची सहायक स्तरावर ई-पीक पाहणी करावयाची शिल्लक आहे. उर्वरीत पीक पाहणी सहायकांमार्फत पुर्ण करण्याबाबत सर्व तहसिलदार यांना प्रशासनाने निर्देशीत केले आहे. शासनाच्या विविध जसे पीक विमा, पीक कर्ज नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई तसेच शेतमालास किमान आधारभूत किमत याचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी करावयाचे राहिलेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीक्षेत्राची सहायकामार्फत ई-पीक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis