दहा वर्षांचा प्रणित बनला वंचित मुलांसाठी शिक्षणाचा आधारवड
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। : वयाच्या दहाव्या वर्षी काय करतो आपण? कदाचित खेळतो, कार्टून पाहतो, किंवा अभ्यास करतो. पण, मुंबईतील विटी इंटरनॅशनल स्कूलचा प्रणित धारेवा हा इयत्ता सहावीतील चिमुकला याला अपवाद आहे. केवळ दहा वर्षांच्या या ''चेंजमेकर''न
Pranit


मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। : वयाच्या दहाव्या वर्षी काय करतो आपण? कदाचित खेळतो, कार्टून पाहतो, किंवा अभ्यास करतो. पण, मुंबईतील विटी इंटरनॅशनल स्कूलचा प्रणित धारेवा हा इयत्ता सहावीतील चिमुकला याला अपवाद आहे. केवळ दहा वर्षांच्या या 'चेंजमेकर'ने आपल्या सहानुभूतीच्या बळावर २,००० हून अधिक वंचित विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे.

कोरोना महामारीच्या भयावह लॉकडाऊनमध्ये, जेव्हा प्रणित केवळ सहा वर्षांचा होता, तेव्हा त्याला जाणवले की अनेक मुलांचे शिक्षण थांबले आहे. त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाची सोय नाही. खेळण्याच्या वयात त्याने 'पढाओ इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक उपक्रमाची बीजे रोवली. हा प्रवास एका लहान वैयक्तिक प्रयत्नातून सुरू झाला आणि आज तो देशभरातील वंचित मुलांसाठी शिक्षणाचा आधारवड बनला आहे!

'पढाओ इंडिया'चे मॉडेल अतिशय हृदयस्पर्शी आहे. या उपक्रमात, प्रणितसारखे ज्येष्ठ विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतात आणि लहान मुलांना ऑनलाइन मार्गदर्शन करतात. ते केवळ इंग्रजी, गणित किंवा विज्ञान शिकवत नाहीत, तर त्यांना मूल्य शिक्षण आणि सहानुभूती शिकवतात.

मला माझ्या परीने शक्य तेवढा बदल घडवून आणायचा होता, प्रणित अत्यंत विनम्रतेने सांगतो. त्याच्या याच साध्या इच्छेने आज २,००० हून अधिक मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षणाचा आत्मविश्वास आणला आहे. प्रत्येक स्वयंसेवक पाच मुलांना शिकवतो आणि त्यांना ५० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रे आणि कौतुकाची चिन्हे देऊन प्रोत्साहित केले जाते. यामुळे केवळ शिक्षणच नाही, तर शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यातही मदत होते.

प्रणितच्या या अलौकिक कार्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कार २०२३ आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून सत्कार यांसारख्या मोठ्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्याच्या शाळेच्या प्राचार्या, सौ. सोनिया राणा यांनीही अभिमानाने म्हटले आहे की, प्रणितचे कार्य शाळेच्या मूल्यांचे प्रतीक आहे.

मार्च २०२६ पर्यंत ५०० स्वयंसेवकांच्या मदतीने २,५०० मुलांना आधार देण्याचे 'पढाओ इंडिया'चे ध्येय आहे. हा एक विद्यार्थी, त्याचे साधेसे स्वप्न आणि हजारो वंचित मुलांच्या भविष्यात त्याने पेरलेला उज्वल आशेचा किरण आहे!

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande