रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा - खा.नरेश म्हस्के
ठाणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकासकामे, ठाणे - मुलुंड स्थानका दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील सं
ठाणे


ठाणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकासकामे, ठाणे - मुलुंड स्थानका दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर खंत व्यक्त करत विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.

रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना, रवनीत सिंह उपस्थित होते. या समितीत देशभारतील १५ खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होतात. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वे विषयक समस्या, देशापातळीवरील रेल्वेच्या मुलभूत प्रश्नांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

ठाणे ते मुलुंड स्थानका दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करुन तातडीने काम सुरु करावे, ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ शी जोडेल. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल. ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ आणि ९, १० येथे एक्सलेटरची उभारणी करणे गरजेचे आहे. भाईंदर रेल्वे स्थानकातून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढविणे, दादर रेल्वे स्थानकातून पश्चिम रेल्वेने जोधपूर येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु करणे, अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस दैनंदिन सोडण्यात यावी, जोधपूर आणि जयपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना भाईंदर येथे थांबा द्यावा, भाईंदर स्थानकात नव्याने होत असलेल्या फलाटाची रुंदी १० मीटरने वाढविण्यात यावी, मीरा रोड स्थानकांत तिकीट खिडकीची संख्या वाढविण्यात यावी, पनवेल ते नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान विशेष लोकल सुरु करणे, सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखणे, त्यांची संख्या वाढविणे, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांत वन रुपी रुपये क्लिनिक सुरु करणे, पादचारी पूल, लिफ्ट, एक्सलेटरची संख्या वाढविणे अशा विविध आग्रही मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत केल्या.

सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande