
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत समुद्रकिनारी सुरक्षा उपायोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या वेगाने वाढत आहे. वर्षाला अंदाजे ३० लाख पर्यटक तेथे येत असतात. पण गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्यामुळे समुद्रावर पोहण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आतापर्यंत १५० ते २०० पर्यटकांचे बळी गेले, तर काही पर्यटक गंभीर जखमी झाले.
या सर्व गोष्टींचा विचार करता गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे. तत्काळ सुरक्षा उपाययोजना केली नाही, तर पर्यटनावर मोठा परिणाम दिसून येत आहे. घाबरल्याने गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा परिणाम पर्यटक व्यवसायावरही होत आहे. लाखो रुपये कर्ज काढून व्यवसाय करणारे व्यावसायिक अडचणीत आहेत.
या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता आपण गणपतीपुळे समुद्रकिनारी तत्काळ सुरक्षा उपायोजना कराव्यात, अशी मागणी श्री. भाटलेकर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी