
ठाणे, 17 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून १५ जाने. रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्याचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेस ठाणे शहर - जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. त्यानुसार, गुरुवारी (ता.१८ डिसेंबर २०२५) ठाणे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात १५० निष्ठावंत इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेसची संसदीय समिती घेणार आहे.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जाहिर झाली असुन ३३ प्रभागांमध्ये १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. यामुळे राजकिय हालचालींना प्रचंड वेग आला असुन सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी इच्छुकांची पहिली पसंती काँग्रेसलाच आहे. या अनुषंगाने काँग्रेसकडे उमेदवारांची रीघ लागली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसकडे १५० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी दि.1८ डिसेंबर रोजी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे प्रभारी अतुल लोंढे, विधानसभा प्रभारी श्रीरंग बर्गे, चंद्रकांत पाटील, अबिद खान,आनंद सिंग तसेच काँग्रेसच्या जिल्हा निवड समितीतील सदस्यांच्या उपस्थितीत ठाणे काँग्रेसचे मुख्य कार्यालय येथे घेण्यात येणार आहेत. तरी सर्व इच्छुकांनी आपली व्यक्तीगत माहिती व प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काँग्रेसकडे तब्बल १५० जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. याबाबत बोलताना ॲड. विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, पुर्वी 'ठाणे' हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचा चंग कार्यकर्त्यानी बांधला आहे. तेव्हा केवळ काँग्रेसच्या निष्ठावंतांनाच निवडणुकीचे तिकिट दिले जाणार असुन इच्छुक उमेदवाराचे प्रभागातील काम, जनसंपर्क व पक्षाच्या कार्यक्रमामध्ये असलेला सक्रिय सहभाग याचा देखील विचार केला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडे एका एका प्रभागात अनेक इच्छुक असल्याने उमेदवारी देताना संसदीय समितीचा कस लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर