
कोल्हापूर, 19 डिसेंबर, (हिं.स .)। हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. प्रॉपर्टीसाठी एकुलत्या एका मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारानंतर संशयिताने स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या घटनेत विजयमाला नारायण भोसले (वय 70) आणि नारायण गणपतराव भोसले (वय 78, रा. महावीर नगर, अल्फालाईन गल्ली, हुपरी) या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुहेरी हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले (वय 48) यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोसले गेल्या काही महिन्यांपासून घरवाटणीच्या मागणीवरून आई-वडिलांशी सतत वाद घालत होता. वृद्ध दाम्पत्याने ही मागणी मान्य न केल्यानं वैतागलेल्या सुनीलने आज शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हे भयानक कृत्य केलं.
प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, सुनीलने झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर प्रथम काठी आणि दगडाने प्रहार केला आणि त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. या हल्ल्यात वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आई विजयमाला यांच्या डोक्यातही काचेच्या तुकड्याने घाव घालून त्यांच्याही हाताची नस कापली. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सुनील शांतचित्ताने घराबाहेर आला आणि काही वेळाने स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेचे (FSL) तज्ञ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ठसे, शस्त्र, रक्ताचे नमुने आणि काचेचे तुकडे यांसह विविध पुरावे संकलित केले आणि तपासणी नेले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हत्येचं नेमकं कारण स्पष्ट नसलं तरी घरवाटणीच्या वादाशिवाय मानसिक तणावाचीही शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
भोसले कुटुंब हे स्थानिक पातळीवर सर्वसामान्य आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखलं जात होतं. दाम्पत्याला तीन अपत्ये असून थोरला चंद्रकांत आणि संजय हे सराफी व्यवसायात कार्यरत असून दोघेही बाहेरगावी वास्तव्यास आहेत. संशयित सुनील विवाहित असून त्याला मुलगा आणि मुलगी आहेत; मात्र, त्याचे पत्नीशी मतभेद झाल्याने गेल्या काही वर्षांपासून आई-वडिलांसोबत राहत होता.
दरम्यान, या दुहेरी हत्येच्या घटनेनंतर महावीर नगर परिसरातील नागरिकांमध्ये या प्रकाराबद्दल हळहळ आणि संताप व्यक्त होत असून, शांत आणि सर्वसामान्य कुटुंबात एवढा मोठा अनर्थ कसा घडला, या प्रश्नाने परिसर हादरला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar