
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त परभणी जिल्हा कम्युनिस्ट पक्षामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संघर्ष, बलिदान आणि समाजपरिवर्तनाच्या शतकभराच्या प्रवासाचे स्मरण करीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मानवतकर हॉस्पिटल समोर, जीवन ज्योती रेस्ट हाऊस हॉल येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लाल सलामी देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या क्रांतिकारी इतिहासाला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी नेते कॉ, राजन क्षीरसागर जिल्हा सचिव माधुरी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि दलित घटकांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही लढे उभारले आहेत. आजही संविधान, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्याय वाचविण्यासाठी जनता एकत्र आली पाहिजे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक संघर्षपूर्ण लढ्यांचा इतिहास — आंतरराष्ट्रीय क्रांती, उस्मानाबाद येथील कोडझे समितीचे आंदोलन, तसेच क्रांतिकारकांचे बलिदान — यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरोधात कम्युनिस्ट चळवळ आजही सक्षम पर्याय म्हणून उभी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते, समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शताब्दी वर्षानिमित्त भविष्यकाळातही समाज हितासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प या सभेत करण्यात आला.
या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सेनानी सय्यद आझम (परभणी ) कॉ.उत्तमराव कोदरीकर यांना स्मरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वेळी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर, यामध्ये पक्षाच्या जिल्हा सचिव कॉम्रेड माधुरी क्षीरसागर,शिवाजी कदम, ओंकार पवार, अब्दुल शेख,सय्यद अझर,लिंबाची कचरे,श्रीनिवास वाकणकर, आदी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis