
रत्नागिरी, 29 डिसेंबर, (हिं. स.) : माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे तो मी पूर्ण करेन. सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून तो एकच ध्यास समोर ठेवून मी काम करणार आहे असे प्रतिपादन गुहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप यांनी केले.
सौ. मालप यांनी आज पदभार स्वीकारला. त्यावेळी त्या बोत होत्या. गुहागर नगरपंचायत सभागृहात हा कार्यक्रम मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सौ. मालप पुढे म्हणाल्या की, येथे येताना पक्षाचे झेंडे सर्वांनीच बाजूला ठेवावे. आपण येथे फक्त गुहागर नगरीचा विकास करण्यासाठी आलेले आहोत. आपल्याला उत्कृष्ट दर्जाची कामे करायची आहेत. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम करून आदर्श निर्माण करू या.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, एक चांगली, आदर्शवत नगरपंचायत बनवू या. त्यासाठी सर्वांनीच चांगले प्रयत्न करावे. राज्यात सत्ता महायुतीची असून विकास निधी कधीच कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर सभेत सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत मदत करण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आजही दूरध्वनीवरून नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन करून गुहागर नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन दिले असल्याचे राजेश बेंडल यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिंदे सेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर तालुका भाजपा अध्यक्ष अभय भाटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, प्रांजली कचरेकर नवनिर्वाचित नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी