'सन मराठी'वर  'तू अनोळखी तरी सोबती' नवी मालिका ५ जानेवारीपासून
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)। ''सन मराठी''वर ''तू अनोळखी तरी सोबती'' या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी येत्या ५ जानेवारीपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षक
'सन मराठी'वर  'तू अनोळखी तरी सोबती' नवी मालिका ५ जानेवारीपासून


मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)। 'सन मराठी'वर 'तू अनोळखी तरी सोबती' या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी येत्या ५ जानेवारीपासून दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता व समीर या दोघांची ही कथा असून, नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील? नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे पाहणं रंजक असणार आहे.

या मालिकेत अर्पिता हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली की, या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक नवीन पात्र घेऊन प्रेक्षकांसमोर मी येत आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक, आनंद अश्या भावना आहेत. अर्पिता हे पात्र अगदीच साधं, सुशील, कुटुंबाचा विचार करणारी, प्रत्येकाचं मन जपणारी मुलगी आहे. ही एका चाळीत राहणाऱ्या मुलीची गोष्ट असल्याने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना आपलंस करुन घेणारी ठरेल. अर्पिता आणि योगिता मध्ये प्रचंड फरक आहे. अर्पिता कधीच स्वतःसाठी जगली नाही, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत राहणारी ती व्यक्ती आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यातही अशी एक व्यक्ती येईल तेव्हा खरंच मॅजिक होईल. मी सुद्धा गेली २१ वर्ष ठाणे येथील किसननगर चाळीत राहिली आहे. त्यामुळे चाळीत शूटिंग करण्याचा आंनद काही वेगळाच आहे. या मालिकेमुळे चाळीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय. प्रेक्षकांना आमची नवी मालिका आणि अर्पिता हे पात्र नक्की आवडेल ही खात्री आहे.

मालिकेत समीर हे पात्र साकारणारा अभिनेता अंबर गणपुले म्हणला की, दोन अनोळखी व्यक्तींची ही कहाणी आहे. समीर हे पात्र खूप सौम्य, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारा आहे. कायम चेहऱ्यावर स्मित हास्य, नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक गोष्टी आत्मसात करणारा आहे. त्यामुळे या पात्राकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मालिकेचा प्रोमो पाहून बऱ्याच जवळच्या माणसांनी कौतुक केलं. मालिकेचा विषय, साधेपणा या सगळ्याच गोष्टी मालिकेविषयी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. मी चाळीत कधी राहिलो नाही. पण ते जीवन मी लहानपणीच्या सुट्यांमध्ये अनुभवलं आहे. चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि आता समीरमुळे मला चाळीतलं जीवन जगायला मिळतंय. नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे ५ जानेवारी पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मी सुद्धा खूप उत्सुक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande