जाहीर प्रचाराचा संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार साहित्य तत्काळ हटवावे - बीएमसी
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) - बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्‍या अनुषंगाने जाहीर प्रचाराचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्‍टात आल्‍यानंतर सर्व संबंधित राजकीय पक्ष तसेच उमेदवार यांनी प्रचार सा
डॉ. अश्विनी जोशी मुंबई मनपा


मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) - बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्‍या अनुषंगाने जाहीर प्रचाराचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्‍टात आल्‍यानंतर सर्व संबंधित राजकीय पक्ष तसेच उमेदवार यांनी प्रचार साहित्य तत्काळ हटवावे, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक प्रचार साहित्य न हटविल्‍यास या प्रकरणी मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात येईल. तसेच, प्रचार साहित्य काढण्याकरिता प्रशासनाला आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवारांच्या खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल, असेदेखील डॉ. जोशी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांच्‍या आदेशानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर असणार आहे. त्यानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होणार आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे तसेच मुद्रीत माध्‍यमाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. यामध्ये मेसेजिंग ॲपस् तसेच समाज माध्‍यमे, उदाहरणार्थ यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, एक्स, इत्‍यादी सर्व प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.

जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर प्रचार साहित्य संबंधित उमेदवार / पक्षांनी तात्काळ काढून टाकणे आवश्यक राहील. जर त्यांनी असे प्रचार साहित्य जाहीर, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर काढले नाही तर त्याबाबत मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रचार साहित्य काढण्याकरिता प्रशासनाला आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवारांच्या खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तरी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रचार इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमाद्वारे करू नये. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सर्व संबंधित राजकीय पक्ष व उमेदवार यांनी प्रचाराशी संबंधित सर्व साहित्य तत्काळ काढून टाकावेत असे आदेश डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande