
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे नाचणे येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात आयोजित ब्रह्मानंद ग्राहक पेठेला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी रुचकर उद्योग समूहाचे संचालक सुनील सहस्रबुद्धे म्हणाले, उच्च शिक्षण झाले की लाखो रुपयांची पॅकेज मिळाल्याने अनेक युवक, युवती उद्योगाकडे वळत नाहीत. तरुणांनी खरे तर उद्योजक बनून नोकऱ्या दिल्या पाहिजेत. रत्नागिरीत प्रक्रिया उद्योग व अन्य प्रकारच्या उद्योगांमध्ये संधी आहेत. पहिली ७ वर्षे उद्योजकाने फायदा बघू नये, असे माझ्या वडिलांनी सांगितले होते. परंतु आता समाजातूनही चांगली मदत मिळत असल्याने युवकांनी व्यवसायाकडे वळावे. निरीक्षण, मार्गदर्शनातून व्यवसायवृद्धी होते.
यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्यवाह रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, सदस्य अरुण गानू, सौ. आदिती भावे, सौ. नीलम जोशी, चंद्रकांत सरदेसाई, देवदत्त पेंडसे उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात २० स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्या सर्वांनाच चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी अध्यक्ष अनंत आगाशे म्हणाले की, गोखले भवनात दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर सभागृह बांधण्यात येत आहे. त्याचा उपयोग छोट्या कार्यक्रमांसाठी करता येणार आहे. यातील काही भाग लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांच्या शिकवणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुढच्या काही वर्षांत ही ब्रह्मानंद ग्राहकपेठ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी