
बीड, 13 जानेवारी, (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतने गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या राख व्यवसायाचे सरपंच व व ग्रामसेवकाने संगनमताने टेंडर काढले होते. ते तत्काळ रद्द करावे यासाठी सहा तास आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत लेकराबाळासहित नदीपात्रात जलसमाधी घेण्यासाठी उतरले होते. टेंडरला स्थगिती दिली असल्याने हे जलसमाधी आंदोलन तूर्त मागे घेतले आहे. माजलगावपासून १० किमीवर मंजरथ हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कारानंतरची राख (रक्षा) विसर्जन करण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. त्या राखेचे ग्रामपंचायत कार्यालय गोदावरी नदी येथे पात्रातील दशविधी (रक्षा) लिलाव काढले आहे. या लिलावामुळे गावातील व पारंपरिक वडिलोपार्जित काम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे मंजरथ गावची संस्कृती व परंपरा मोडीस येत आहे. याने लोकांची श्रद्धा, भावना दुखावल्या जात आहेत व ग्रामस्थ पारंपरिक रक्षा चालून उपजीविका भागवणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. त्यामुळे हा लिलाव तत्काळ रद्द करावा यासाठी मंजरथ येथील गोदावरी नदीपात्रात भीमराव कदम, रामनाथ चुंबळे, अनिल चुंबळे अर्जुन जाधव, इसाक बेग, महानंदा कचरे, करुणा चौरे, अरुणा शिंदे, छाया टाकणखार यांच्यासह मुले, वृद्ध जलसमाधी घेण्यासाठी नदीपात्रात उतरले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis