
नवी दिल्ली , 24 फेब्रुवारी (हिं.स.)।केरळचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या उपक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर केला आहे. संभाव्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या मुद्द्यावर टोला लगावत नवा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्याचे नाव ‘केरळम’ झाले तर इंग्रजीत केरळमधील लोकांना काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नावबदलाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिले की नाव बदलणे योग्य असले, तरी इंग्रजी भाषिकांसाठी एक छोटासा भाषिक प्रश्न निर्माण होतो. ‘केरळाइट’ आणि ‘केरळन’ या शब्दांचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विनोदी शैलीत त्यांनी म्हटले की ‘केरळमाइट’ हा शब्द एखाद्या सूक्ष्म जीवासारखा वाटतो, तर ‘केरळमियन’ एखाद्या खनिजासारखा भासतो. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत नव्या शब्दासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा सल्लाही दिला.
प्रत्यक्षात, केरळ विधानसभेने दोनदा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे संविधानात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. राज्याचे नाव त्याच्या मल्याळम उच्चारानुसार ‘केरळम’ करावे आणि ते आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांमध्ये लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता केंद्र मंत्रिमंडळानेही या नावबदलाला मंजुरी दिल्याने अधिकृतरीत्या राज्याचे नाव बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान राज्य भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी ‘केरळम’ हे नाव योग्य असल्याचे म्हटले. राज्य आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्यामुळे हा बदल योग्य ठरेल, असे त्यांनी नमूद केले. लोकांना बदल हवा आहे आणि केवळ आंदोलनात्मक राजकारण नको आहे, असेही ते म्हणाले. या मुद्द्यावर सीपीएम, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांचा नावबदलाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode