
अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
बाजार समितीचे विभाजन करीत भातकुली तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर तीव्र हरकती नोंदविण्यात आल्या असून, ही अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी सहकार क्षेत्रातील १७ व्यक्तींनी अर्ज केलेले आहेत. या बाजार समितीचे विभाजन व्हावे याकरिता पाच अर्ज सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत.शासनाकडून मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुकास्तरावर बाजार समिती स्थापन करण्याला सुरूवात झाली आहे. अशातच स्वतंत्र भातकुली बाजारसमितीची अधिसुचना २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विदर्भात दुसऱ्या क्रमाकाची असलेल्या अमरावती बाजार समिती मधून भातकुलीतालुका वेगळा करीत दोन्ही बाजार समितीला स्वंतत्र दर्जा देण्यात आला आहे. यावर २८ फेब्रुवारी पर्यंत आक्षेप हरकती मागविण्यात आले. शुक्रवार, २७ फेब्रुवारीपर्यंत बाजार समितीच्या विभाजनाला १७ जणांनी आक्षेप घेत भातकुलीचे विभाजन करू नका अशी मागणी केली आहे. तर विभाजनाच्या समर्थणार्थ केवळ ५ अर्जप्राप्तझाले आहेत. या अर्जावर जिल्हा उपनिबंधकाकडे सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम निर्णय घेतल्या जाणार आहे.
विभाजनाचा डाव हाणून पाडू
दोन्ही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणातील शेतमालामुळेच या बाजार समितीची आर्थिक घडी मजबूत राहिली आहे. भातकुली, आष्टी आणि खोलापूर येथील उपबाजार पेठांवर यापूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र त्या आजही भंगारवस्थेत आहेत. पुन्हा स्वतंत्र बाजार समिती स्थापन केल्यास कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे विभाजनाचा डाव हाणून पाडण्याकरिता सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करू.
हरीभाऊ मोहोड, संचालक, जिल्हा मध्यवती बँक.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी