
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना संदर्भात कार्यशाळा व मार्गदर्शन बैठक जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
कार्यशाळेस उपजिल्हाधिकारी (रोहयो) शोभा जाधव, सर्व उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (पीएमजीएसवाय/सीएमजीएसवाय), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, वन परीक्षेत्र अधिकारी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योजनेची अंमलबजावणी करताना शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित रस्त्याला संकेतांक असल्याची खात्री करूनच शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळते तेथे अतिक्रमित धारकांना समजावून अतिक्रमण दूर करावे, तसे न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या.
महसूल विभागाच्या विविध शासन निर्णयांनुसार योजनेची अंमलबजावणी पद्धती, मार्गदर्शक तत्त्वे तसेच प्रशासकीय प्रक्रिया याबाबत श्रीमती जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्यांची सुधारणा करून शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच शासन निर्णयानुसार पाणंद रस्त्यांचे सीमांकन, क्रमांक देणे तसेच गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या रस्त्यांचे प्रकार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis