
बीड, 14 मार्च (हिं.स.)।आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा साठा दहा दिवस तसेच घरगुती गॅसचा ३० दिवस पुरेल इतका साठा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वसुधा रघाटाटे,निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर, सहा. महसूल अधिकारी प्रकाश तांबडे, कीर्तीमाला कुलकर्णी तसेचतेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थतीत बैठकीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सध्या बीड जिल्ह्यात सुमारे ३० दिवस पुरेल एवढा एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध असून पेट्रोल व डिझेलचाही १० दिवसांपेक्षा अधिक साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच तेल कंपन्यांच्या डेपोमध्येही सुमारे ३० दिवसांचा साठा शिल्लक असल्याने टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी भीतीपोटी इंधनाचा अनावश्यक साठा करू नये तसेच गॅस एजन्सीवर गर्दी करू नयेदरम्यान, काही ठिकाणी गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे घेणे, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे, ग्राहकांना उशिरा पुरवठा करणे अशा तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके वेळोवेळी गॅस एजन्सीची तपासणी करून ग्राहकांशी संपर्क साधणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis