
लातूर, 14 मार्च, (हिं.स.)। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता दगदोजीराव देशमुख स्मारक भवन, मार्केट यार्ड, मोती नगर, लातूर येथे संपन्न होणार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
या कार्यक्रमात श्री. गणेश शिंदे (व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अध्यात्मदृष्टिकोनावर, समाजकार्यातील त्यांच्या प्रभावावर तसेच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विचारांवर आधारित विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
लातूर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis