
पुणे, 14 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमधील मतमोजणीची प्रक्रिया रविवारी (दि. 15) साहित्य परिषदेतच (टिळक रस्ता) होणार आहे. सकाळी साडेआठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीला स्वतः उमेदवार आणि त्यांच्यासोबत फक्त एक प्रतिनिधीची उपस्थिती, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला मोबाईल किंवा कॅमेरा आणण्यास बंदी, कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास बंदी, असे विविध नियम मतमोजणीसाठी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली.साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. दहा वर्षांनंतर परिषदेच्या निवडणुका होत असून, परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि साहित्य संवर्धन आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये निवडणुकीत चुरस आहे. राज्यभरात परिषदेचे 16 हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे इतर जिल्हा प्रतिनिधी बिनविरोध निवडून आल्याने परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीन पदांसह पुणे जिल्हा आणि शहर कार्यवाहपदासाठी ही निवडणूक होत आहे. टपालाने मतपत्रिका पाठविण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांच्या समक्ष मतपेट्या सील केल्या जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु