
मुंबई, 14 मार्च, (हिं.स.)। पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदल, संधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, मानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता; डिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल, मात्र जे काही काम स्वयंचलित होऊ शकते ते एआयमुळे स्वयंचलित होणार हेही वास्तव आहे, असे त्यांनी नमूद केले.
आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत आहे. जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांना एआयचे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे ज्ञान निर्मिती, प्रसार आणि वापराची संपूर्ण पद्धत झपाट्याने बदलत आहे. पत्रकारितेतील अनेक कामे ही स्वयंचलित होत आहेत. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित (ऑटोमेटेड) होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याची जबाबदारी मात्र मानवी बुद्धिवरच राहणार आहे. त्यामुळे एआयमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलणार असले, तरी पत्रकारितेचे मूलभूत बळ म्हणजे विश्वास असून सत्यता, विश्वास आणि संपादकीय जबाबदारी ही पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कायम राहणार आहेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत (हायपर पर्सनलाइज्ड) होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या “अटेन्शन इकॉनॉमी” मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जात आहे. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे अनेक पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांना पाठवतात आणि कोणता प्रकार प्रभावी ठरतो याचा अभ्यास करतात, अशी माहितीही प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर