
बीड, 19 मार्च (हिं.स.)। बीड जिल्ह्यात वीजबिलाची थकबाकी वाढल्याने महावितरणने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. जिल्ह्यातील सुमारे सव्वादोन लाख ग्राहकांकडे १५५ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी असून चालू महिन्याची वसुली केवळ ६२ टक्केच झाली आहे. लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा थेट मीटर काढून खंडित केला जात आहे.
स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा पुरवठा स्वयंचलितपणे बंद होत असून अनधिकृतपणे वीज जोडल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि बीड विभागातील थकबाकीचे मोठे आव्हान समोर असल्याने सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करत आहेत. कारवाईची कटू वेळ टाळण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी चालू देयकासह आपली थकबाकी त्वरित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis