
रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि लघु-मध्यम उद्योगांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंगळवारी, दि. २४ मार्च रोजी विशेष जिल्हास्तरीय खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या संमेलनासोबतच फणस प्रक्रिया विषयावर कार्यशाळाही पार पडणार आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट खरेदीदारांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. बाजारपेठेतील नवीन संधी शोधणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि थेट व्यवहार करणे यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. यादरम्यान विविध विषयांवर परिसंवादही आयोजित करण्यात आले आहेत. या संमेलनात खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे.
कोकणचा मेवा मानला जाणाऱ्या फणसावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ आणि त्यांचा आहारामधील महत्त्व यावर विशेष चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे फणस उत्पादकांना मूल्यवर्धनासाठी योग्य दिशा मिळणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा : खरेदीदार म्हणून सहभागासाठी : शत्रुघ्न म्हात्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण (९१८५२०८०८४). विक्रेता म्हणून सहभागासाठी : अमोल सपकाळ, तालुका कृषी अधिकारी, राजापूर (९०२८७९०७४१)
जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रक्रियादार, खरेदीदार आणि विक्रेत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि 'आत्मा'चे प्रकल्प संचालक विजय बेटीवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी