
अकोला, 25 मार्च (हिं.स.)। ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान अडीचशे गावांसाठी २९९ उपाययोजनांचा समावेश असून, कामे वेळेत पूर्ण व्हावीत. कुठेही टंचाई उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.
टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च, तसेच एप्रिल ते जून दरम्यान सर्व कामे मिळून २६२ गावांसाठी ३१४ विविध उपाययोजना व त्यासाठी चार कोटी २७ लक्ष ४० हजार रू. च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान १२ गावांसाठी १५ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला.
आराखड्यात अकोला तालुक्यातील १६, बार्शीटाकळी तालुक्यातील ६७, बाळापूर तालुक्यातील २३, पातूर तालुक्यातील ५६, मूर्तिजापूर तालुक्यातील ३९, अकोट तालुक्यातील ३३ व तेल्हारा तालुक्यातील २८ अशा एकूण २६२ गावांचा समावेश आहे. विहिर अधिग्रहणाची १२७, विहीर खोलीकरण, गाळ काढणे ९, नळयोजना विशेष दुरूस्ती १०, विंधनविहीर विशेष दुरूस्ती ९२, नवीन विंधन विहीर ४६, कूपनिका २६, रिचार्ज शाफ्ट, नाला खोलीकरण ४ अशी एकूण ३१४ कामे आहेत.
नळयोजना विशेष दुरूस्तीच्या कामांमध्ये अकोला तालुक्यातील यावलखेड, चाचोंडी, आगर, गांधीग्राम, रोहणा, पातूर तालुक्यातील बाभुळगाव, भंडारज बु., बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, वझेगाव, मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील नळयोजनेचा समावेश आहे. नळयोजना विशेष दुरूस्तीसाठी १ कोटी ५६ लक्ष ८१ हजार ४३८ रू. निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे