
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील जुना सर्व्हे नंबर ३६९ मधील सुमारे 4500 घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानसभेत सदस्य राजेश बकाने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, संबंधित भागात या ठिकाणी 4500 पेक्षा अधिक घरे अस्तित्वात आहेत. या सर्व घरांना त्यांच्या मालकीचा हक्क मिळणे आवश्यक आहे. या घरमालकांना खासगी सनद, प्रॉपर्टी कार्ड तसेच त्यांच्या घरांच्या नोंदी अभिलेखात नोंदवून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्रीमंडळात निर्णय घेतला आहे. दि.1 जानेवारी 2011 पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन महत्त्वाचा निर्णय घेत आहे. नगरपालिकांमध्ये संबंधित समित्या, महानगरपालिकांमध्ये जिल्हाधिकारी समिती आणि ग्रामीण भागात तहसीलदार समितीला अधिकार देऊन अशा घरांचे प्रॉपर्टी कार्ड नियमित करण्यात येणार आहे. पूर्वी झालेल्या चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व अभिलेख दुरुस्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर