राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४ मार्च) मुंबई येथे १५ उत्कृष्ट युवा उद्योजक व नवोन्मेषकांना इंडिया टुडे ग्रुप–महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपालांनी
मुंबई


मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४ मार्च) मुंबई येथे १५ उत्कृष्ट युवा उद्योजक व नवोन्मेषकांना इंडिया टुडे ग्रुप–महिंद्रा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपालांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतरित केल्याबद्दल तसेच भारतातील स्टार्टअप संस्कृतीला चालना दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

कोणतेही मोठे कार्य युवा वयात होते असे सांगताना राज्यपालांनी संत ज्ञानेश्वर, आदि शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तींची उदाहरणे दिली व या सर्वांनी तरुण वयातच विलक्षण कार्य केले असल्याचे सांगितले. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था असून दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि १०० हून अधिक ‘युनिकॉर्न’ कंपन्या आहेत, असे राज्यपालांनी नमूद केले. एकट्या २०२५ या वर्षातच ४४,००० हून अधिक नवीन स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून त्यातून २१ लाखांपेक्षा अधिक थेट रोजगारनिर्मिती झाली आहे. यापैकी जवळपास निम्मे स्टार्टअप्स छोट्या मोठ्या शहरांतून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुंबई या आर्थिक राजधानीशिवाय पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारखी शहरे नवोन्मेष आणि उद्योगशीलतेची महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.

राज्यपाल हे २९ विद्यापीठांचे कुलपती आहे असे नमूद करून विविध विद्यापीठांमधून ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण, निमशहरी तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे प्रोत्साहित करून भविष्यातील ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ घडविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत राज्यपालांनी त्यांना देशातील लाखो युवकांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यास प्रेरित करत राहण्याचे आवाहन केले. इंडिया टुडे ग्रुप आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी या पुरस्कारांची स्थापना करून देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या नव्या नेतृत्वाचा गौरव केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला इंडिया टुडेचे समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा, महिंद्रा ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनकांत गोलगुंटा, इंडिया टुडे ग्रुप व महिंद्रा अँड महिंद्रा यांचे वरिष्ठ अधिकारी, परीक्षक मंडळाचे सदस्य, पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार विजेते

नव्या नवेली नंदा – उद्योजिका व समाजसेविका (प्रोजेक्ट नवेली)

गझल अलघ व वरुण अलघ – सह-संस्थापक, होनासा कंझ्युमर लिमिटेड

बोधिसत्त्व संघप्रिय – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयजी डिफेन्स

प्रणव वेम्पती – मुख्य कार्यकारी अधिकारी, मेकर्स हायव्ह

आवर्णा जैन – उपाध्यक्षा, सारेगम इंडिया; अध्यक्षा, आरपीएसजी लाइफस्टाइल मीडिया

तरुण विग – मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक, इनेफू लॅब्स

सारा शाम – प्रमुख डिझायनर व संस्थापक, एस्साजीज अटेलियर

नारायण सुब्रमण्यम (सीईओ) व नीरज राजमोहन (सीटीओ) – सह-संस्थापक, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह

अग्नीश्वर जयप्रकाश – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, गरुडा एअरोस्पेस

राधिका गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाइस म्युच्युअल फंड

माधव कृष्ण – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वाहन.एआय

मेहताब अली नियाझी – सतारवादक व संगीतकार

मोना सिंग – अभिनेत्री व उद्योजिका

जेनेलिया देशमुख – अभिनेत्री व उद्योजिका

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande