
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.
विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.
राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने १२ जानेवारी २०२३ रोजी घेतला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध होणार आहेत. नगरविकास विभागाने ९ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरण घोषित केले आहे. तसेच, २२ जून २०२५ रोजी या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र विकासकांची नियुक्तीही निश्चित करण्यात आली आहे.
राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, तरी या आठवड्यात कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. याशिवाय, हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’चा दर्जा देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, उमरखाडी पुनर्वसन प्रकल्पा एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३६ इमारतींचे काम लवकरच सुरू केले जाईल. केंद्राचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर उमरखाडी परिसरातील १२ इमारतींच्या संरक्षक दुरुस्तीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर