
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बकऱ्या चोरणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. तिघेही अकोला जिल्ह्यातील निघाले.
शेख नवाब शेख आशिक (वय २७, रा. हमजा प्लॉट), शेख रिजवान शेख गुलाब (वय ३२, रा. अंबिकानगर), शेख सुमेर शेख लाला (वय २२, नवाबपुरा, अकोला), अशी अटक तिघा संशयितांची नावे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली. तन्वीर खान जमीर खान (रा. नवगज्जी प्लॉट, अंजनगावसुर्जी यांच्या मालकीच्या चार बकऱ्या व तीन बोकड, अशा ४४ हजारांच्या बकऱ्या चोरीस गेल्या होत्या. तिघांनाही अकोला येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अंजनगावसुर्जी हद्दीतील बकऱ्या चोरीची कबुली दिली. तसेच त्यांनी अंजनगावसुर्जी हद्दीतून सात नव्हे तर एकूण नऊ बकऱ्या चोरल्याची कबुली दिली. एकूण ६० हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
अंजनगावसुर्जी हद्दीतील बकऱ्या चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. पोलिस उपनिरीक्षक मुलचंद भांबूरकर, अमोल देशमुख, सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, सागर धापड, विकास अंजिकर, रितेश गोस्वामी, हर्षद घुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी