चंद्रपूर : इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - डॉ. अशोक उइके
चंद्रपूर, 28 मार्च, (हिं.स.)। चंद्रपूरच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. मात्र इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहून गेले. त्यामुळे गतवर्षी 2025 मध्ये नदीचे खोलीकरण करण्याचा संकल्प केला
चंद्रपूर : इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा  - पालकमंत्री डॉ. अशोक उइके


चंद्रपूर, 28 मार्च, (हिं.स.)। चंद्रपूरच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. मात्र इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहून गेले. त्यामुळे गतवर्षी 2025 मध्ये नदीचे खोलीकरण करण्याचा संकल्प केला. या संकल्पचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे. ही नदी आपली आहे, आपल्या शहराची आहे, ही आपली जीवनदायी आहे, अशी भावना ठेवून चंद्रपूरकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग येथे इरई नदीचे खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला महापौर संगीता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, उपमहापौर प्रशांत दानव, मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभागाचे नगरसेवक भालचंद्र दानव, किरण कोतपल्लीवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, उपायुक्त संदीप चिद्रावार, सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, शुभांगी सूर्यवंशी, सीटीपीएसचे प्रभारी मुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे आदी उपस्थित होते.

खोलीकरणाचे काम यावर्षी लवकर सुरू करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, सर्वांनी ही नदी आपली आहे, असे समजण्याची गरज आहे. खोलीकरणासाठी लोकचळवळ निर्माण व्हावी. कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी. नदीच्या कामात चुका काढण्याची मानसिकता ठेवू नका. नदी ही कायम राहणार आहे, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. या नदीच्या खोलीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच कामात एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री अशोक वुइके यांनी दिली. मनपाने प्रभागनुसार व यंत्रणानुसार वेळापत्रक तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नदी ही जीवनदायीनी आहे. चंद्रपूर शहरातून ही नदी वाहते. चार किलोमीटरचा खोलीकरणाचा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागामधूनच शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कंत्राटदारांनी सर्वात प्रथम वेकोलीच्या ओव्हर बर्डनचा भाग कमी करण्याला प्राधान्य द्यावे. या भागात पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी. तसेच येथील घाटाकरिता एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे पूजन आणि खोलीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समितीचे सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande