

नकाशा नसल्याने अधिकाऱ्यांनाही जलवाहिन्यांची माहिती नाही , डोक्यावर हंडा घेऊन नगरसेविकेचे आंदोलन नाशिक, 06 मार्च (हिं.स.)। चार धरणे उशाशी असुनही होणाऱ्या पाणीटंचाईबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या महासभेत रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नाबाबत नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शहरातील पाणाटंचाई ही प्रशासनाचे अपयश असून याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक सचिन मराठे यांनी केली. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १० मधील जलवाहिनीतून कबूतर बाहेर आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांमधील पाणी ड्रेनेजमध्ये जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचीही मागणी नगरसेवकांनी लावून धरली. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या कामात सुसूत्रता नाही. खोदकामादरम्यान फुटलेल्या जलवाहिन्यांवर माती टाकली जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पालिकेकडे जलवाहिन्याचा नकाशा नसून अधिकार्यांनाही जलवाहिन्या कोठे आहे, याची माहिती नसल्याचे महासभेत नगरसेवकांनी सांगत त्याचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करण्यात आली. घरासमोरील रस्ता तीन वेळा खोदला शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नगरसेविका हेमलता पाटील यांनी केला. तसेच त्यांनी स्मार्ट सिटीच्या कारभारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत माझ्या घरासमोरील रस्ता विविध कामांसाठी तीन वेळा खोदल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शहरात सध्या सुरु असलेले काम कोणत्या चौैकटीत सुरु आहे याची माहिती सभागृहाला देण्याची मागणीही त्यांनी केली. नवीन जलकुंभांसाठी बजेटमध्ये तरतूद व्हावी प्रभागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, वॉलमन पाणी सोडण्यासाठी वेळेत येत नाहीत, जून्या जलवाहिन्या दुरुस्त करुन मोठ्या व्यासाच्या व्हाव्या, पाणीकपात करताना अधिकारी जलशुध्दीकेंद्राचे कारणे देतात, पहाटे तीन वाजता पाणी येते याबरोबरच शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. भाजप नगरसेविका माने हंडा घेऊन सभागृहात गुरुवार, दि. ५ मार्च रोजी पहाटे निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावर जात पंटवटी भागात पाणी वळवणार्या भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने बॅनर परिधान करत डोक्यावर हंडा घेऊन सभागृहात आल्या. तसेच प्रभाग क्रमांक तीनच्या हक्काचे पाणी मिळावे, अशी जोरदार मागणी केली. दिवसातून एकवेळ द्या पण पुरेसे पाणी मिळावे. प्रभागात जलकुंभ बांधून पूर्ण असूनही त्यात पाण्याचा थेंब नाही. माझ्या मागणीवर निर्णय व्हावा, नाहीतर जमिनीवर बसून आंदोलन करण्याचा इशारा प्रियंका माने यांनी सभागृहाला दिला. दोन जलशुध्दीकरण प्रकल्प खोदल्याने पाणीटंचाई २०१५ ते २०२० मध्ये जन्म झालेल्या स्मार्ट सिटीने शहरात ८५० कोटींचा कामे केली. ही कामे करताना महापालिकेने २५० कोटींचा निधी स्मार्ट सिटीला वर्ग केला. हे करत असताना स्मार्ट सिटीने २७ एमएलडीच्या दोन जलशुध्दीकरण प्रकल्पांचे काम सहा वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. या पाणीप्रश्नाला कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV